प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या प्रचाराला तुफान गर्दी!
भाजपाच्या सुजाता पालंडेंचा चारही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास
प्रभाग क्रमांक २० मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीला चांगलाच रंग चढलेला पाहायला मिळत आहे. या प्रभागात यंदा तिरंगी लढत होत असून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार उमेदवार तसेच भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने ही लढत अधिकच चुरशीची ठरणार आहे. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.
दरम्यान, रविवारी भाजपाकडून सुजाता पालंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान घोषणाबाजी, झेंडे, बॅनर्स आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता भाजपाने या प्रभागात आपली ताकद दाखवून दिल्याचे चित्र होते. स्थानिक नागरिकांनीही रॅलीला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
जन महापर्वने यावेळी भाजपाच्या चारही उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी सुजाता पालंडे यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “आमचे चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील,” असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही वर्षांत भाजपाने केलेली विकासकामे, पायाभूत सुविधांचा विकास आणि जनतेशी असलेला थेट संपर्क हेच आपल्या विजयाचे प्रमुख कारण ठरणार आहेत.
दुसरीकडे, भाजपाते दुसरे उमेदवार सतिश नागरगोजे यांची लढत माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासोबत होत आहे. ही लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे. या संदर्भात सतिश नागरगोजे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “समोरचा उमेदवार कोण आहे याने मला काहीही फरक पडत नाही. मी माझ्या कामावर आणि मतदारांशी असलेल्या नात्यावर विश्वास ठेवतो.”
या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २० मध्ये निवडणूक चुरशीची आणि काट्याची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून निकालाच्या दिवशीच या संघर्षाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा…
माधुरी मुटकेंसाठी शिवसेना आमदार शरद सोनवने मैदानात!
महिला सफाई कर्मचाऱ्यांवर नाईट शिफ्ट लादली; महापालिकेचा निर्णय वादात!



